TOD Marathi

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. (Statement of Bhagatsingh Koshyari on Shivaji Maharaj) उदयनराजे भोसले त्यासोबतच संभाजीराजे छत्रपती यांच्यासह राज्यातील विविध संघटनांकडून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीने देखील राज्यपालांच्या या विधानाबाबत निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी पुण्यात एका बैठकीचा आयोजन केलं होतं, (Udayanraje Bhosale PC in Pune) यामध्ये राज्यभरातून लोक सहभागी झाली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “हे सगळं जे सुरु आहे ते बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं” असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की मी केवळ या घराण्याचा वंशज म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून ही भूमिका मांडतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्फूर्ती स्थान आहे, त्या व्यक्तिमत्वाबाबत बोलत असताना आपण काय बोलतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळी लोकं अवहेलना करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरलं. विविध चित्रपट आणि चित्रीकरणाच्या गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Udayanraje to meet President of India and Prime Minister)

‘येत्या तीन तारखेला रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीसमोर प्रतीकात्मक आक्रोश मांडणार, भावना व्यक्त करणार आहे. मला खात्री आहे की पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचं बोलणं ऐकतील’ अशी घोषणा पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजे भोसले यांनी केली. ‘थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही? काही लोक राजकीय स्वार्थापोटी शिवरायांवर वक्तव्य करतायेत. अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजेंनी दिली. ‘असं असेल तर शिवजयंती साजरी तरी का करायची? असा प्रश्नही यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे:

  • विविध माध्यमातून शिवाजी महाराजांची अवहेलना केली जाते, आपल्याला राग कसा येत नाही?
  • उद्याच्या पिढीला आपण काय इतिहास सांगणार?
  • महाराज नसते तर आपण अजुन गुलामगिरीत असतो
  • सर्वधर्मसमभावाचा विचार शिवाजी महाराजांनी मांडला.
  • बेगडी प्रेम कशाला दाखवता?
  • हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं
  • लोकशाहीत नागरिक म्हणून तुम्ही कधी जागे होणार?
  • 3 डिसेंबरला रायगडला जाऊन प्रतिकात्मक भावना व्यक्त करु
  • राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री सर्वांची भेट घेणार आहे
  • प्रत्येक पक्ष सोईनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो